परिसर संरक्षण व संशोधन संस्थेचे संस्थापक आणि प्रदूषण नियंत्रण क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर मान्यता पावलेले पर्यावरण तज्ज्ञ वालचंद कॉलेजचे डॉ. बी. सुब्बाराव तसेच सौ. अरुंधती सुब्बाराव यांनी ज्ञानदीप फौंडेशनला सदिच्छा भेट दिली त्यावेळी त्यांचे विद्यार्थी आणि ज्ञानदीप फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. सु. वि. रानडे यांनी त्यांच्या कार्याचा परिचय करून दिला. डॉ. सुब्बाराव यांनी १९६७ पासून वालचंद कॉलेजच्या माध्यमातून प्रदूषण नियंत्रण क्षेत्रात कसे संय़ोधन केले याची सविस्तर माहिती दिली. वालचंद कॉलेजच्या गौरवशाली परंपरेत त्यांचे योगदान फार मोठे आहे. अनएरोबिक लगून आणि प्रेसमड स्पेंटवॉश पासून खत करण्याचे त्यांचे संशोधन आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहे. त्यांच्या हाताखाली शिकलेले अनेक विद्यार्थी आता प्रदूषण नियंत्रण क्षेत्रात मानाची पदे भूषवीत आहेत. वयाच्या ८२व्या वर्षीही ते पूर्वीच्याच उत्साहात कार्यरत आहेत. सौ. अरुंधती सुब्बाराव यांनी घराची सर्व जबाबदारी सांभाळून त्यांना जीवनभर समर्थ साथ दिली आहे. त्यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य घेऊन ज्ञानदीप या क्षेत्रात त्यांचे कार्य आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा प्रयत्न करणार आहे.