- ज्ञानदीप महिला मंडळ
- श्रीमती शरयु अनिल पटवर्धन - कविता
मात नियतीवर
कोणाच्या हातात असतं जगणं आणि मरणं
ना तुझ्या ना माझ्या कोणाच्याच
हातात काही नसतं
कोणाच्या हातात काही नसतं
ते सगळेच असते नियतीकडे
आपण फक्त तिचे बाहुले बापुडे
आहे तोपर्यंत सहन करायचे
एक एक दिवस मोजत राहायचे
ना तुझ्या नि माझ्या कोणाच्याच
हातात काही नसतं
आयुष्याच्या अगदी मध्यान्हीला
करकरीत तिन्ही सांजेला
रक्ताचा पाट वाहील
टाहो पोटात राहील
ट्रकच त्याच्या अंगावरून जाईल
पोटच्या पोराचा असं मरणं
आपल्या हातात नुसतंच रडणं
ना तुझ्या नी माझ्या कोणाच्याच
हातात काही नसतं
कोणाच्याच हातात काही नसतं
आई आलोच म्हणून सांगून गेला
आला परत पांढऱ्या शुभ्र चादरीत गुंडाळलेला
घर माणसांनी तुडुंब भरलेलं
प्रत्येकाच्या तोंडी होते सांत्वनाचे बोल
ओटी रिती झालेली मी अगतिक अबोल
ना तुझ्या नी माझ्या कोणाच्याच
हातात काही नसतं
कोणाच्याच हातात काही नसतं
न जेवताच त्याचं कायमचं जाणं
माझ्या जिवाला ते सतत लागणं
घशाखाली घास उतरतच नाही
कशासाठी कोणासाठी जगायचं कळतच नाही
आता नुसतंच जगणं बाकी काही उरलंच नाही
ना तुझ्या नी माझ्या कोणाच्याच
हातात काही
कोणाच्याच हातात काही नसतं
रोज दिवस उगवतो मनी काळोख दाटतो
तू माझ्या रक्तामासाचा गोळा तुझ्या कशी विसरू रे बाळा
तुझे जगातनसणं मला अजून पेलतच नाही
मन भडभडून येतं मग काही सुचतच नाही
देवाशी मी खूप भांडले ते शांत देव्हा-यात बसलेले
ना तुझ्या नी माझ्या कोणाच्याच हातात काही नसतं
कोणाच्याच हातात काही नसतं
बरेच दिवसांनी तुझ्या खोलीत गेले
तुझे कपाट पुस्तके, कॉट डोळे भरून पाहिले
तुझ्या हसरा फोटो पाहून मन गलबलले
सगळे जिथल्या तेथे अगदी व्यवस्थित
तू मात्र आता कायमचाच अनुपस्थित
ना तुझ्या आणि माझ्या कोणाच्याच हातात काही नसतं
कोणाच्याच हातात काही नसतं
येऊन ठेपलीय दिवाळी चार दिवसांवर
म्हणाला होतास खूप दिवे लाऊ गच्चीवर
आता कसले दिवे माझाच मावळून गेलाय दिवा
मन बधीर पोटात कालव, कशी कणव नाही त्याला
काल तुझी पेटी उघडली नवे कपडे कोरेच राहिले
ना तुझ्या नी माझ्या कोणाच्याच हातात काही नसतं
कोणाच्याच हातात काही नसतं
असे वाटते तू एकदम अचानक येशील
काहीतरी सांगण्याची तुला घाई असेल
हाताला धरून आधी बसवशील
हास्याचे फवारे खोलीभर उडवशील
गप्पा गोष्टीत रात्र उलटलेली असेल
जाग्रणाने डोळे लाल होऊन गेले
मऊ मऊ कापसाची घडी अलगद ठेवेन
तुला झोपलेले बघून मी जाईन सुखावून
मी सुखावून जाईन
माझ्याच हातात
सर्व काही असतं आपल्याच हातात
नियतीवर मात करून खंबीरपणे उभं राहायचं असतं